ठाणे कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भारतीय जनता पक्ष शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला आहे. एकीकडे शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी ठाणे-कल्याण आम्ही लढवणारच असा दावा केला असताना आता दुसरीकडे भारतीय जनता पक्षानंही ठाणे कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मोदी सरकारने राबवलेल्या विविध योजनांचा प्रचार करण्याच्या उद्देशातून भारतीय जनता पक्षातर्फे एका मेळाव्याचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं. या मेळाव्यात ठाणे-कल्याण हे दोन्ही मतदारसंघ आपले होते आणि यापुढेही आपलेच राहतील असा दावा करताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्याला प्रतिसाद दिला. ठाणे, कल्याण आणि पालघर हे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे होते आणि यापुढे राहतील असा दावा आमदार संजय केळकर यांनी या मेळाव्यात बोलताना केला. त्याला कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळे एकूणच राज्यात एकत्र सरकार असलं तरी ठाण्यामध्ये मात्र भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचं दिसत आहे.