ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गिकांचे काम पूर्णत्वाकडे

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम येत्या काही तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे ठाणे पल्याडच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून अप आणि डाऊन मार्गांवर सुमारे 80 लोकल नव्याने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. आज श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकाजवळ पाचव्या सहाव्या मार्गिकेचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी मध्य रेल्वे, एमआरव्हीसीचे अधिकारी उपस्थित होते. पाचव्या – सहाव्या रेल्वेमार्गाचे काम आज रात्री बारा वाजेपर्यंत पूर्ण झालेले असेल. 2007 – 2008 या वर्षात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र 2015 नंतरच या कामाला गती मिळाली. शनिवारपासून या कामाच्या अखेरच्या टप्प्याला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे आणि दिव्या दरम्यान हे काम सुरू होते. एकूण 625 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज पूर्ण होत आहे. यापूर्वी मार्गिका कमी असल्याने लोकल आणि एक्सप्रेस एकच मार्गिकेवर येत होत्या. परिणामी उशीर होणे, गाड्यांचा खोळंबा होणे असे प्रकार होत होते. आता लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ते कल्याणपर्यंत एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास विनाथांबा होणार आहे. स्वतंत्र सहा मार्ग उपलब्ध झाल्याने लोकल, एक्सप्रेस आणि मालगाड्या स्वतंत्र मार्गिकांवर धावतील. या कामामुळे अप आणि डाऊन मार्गांवर सुमारे 80 लोकल सुरू होऊ शकणार आहेत, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading