पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवणा-या ठाणे महापालिकेनं यावर्षीही विसर्जन महाघाट आणि कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. ठाणेकरांनी पर्यायी विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं आहे. शहरातील तलावांमध्ये होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीनं पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या निर्मितीचं काम अंतिम टप्प्यात आहे. गणेश मूर्तींचे विधीवत वाहत्या पाण्यातून विसर्जन व्हावे या दृष्टीकोनातून महापालिकेनं पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे महाविसर्जन घाट तयार केले आहेत. या ठिकाणी लहान गणेश मूर्तींबरोबरच ५ फूट आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रायलादेवी तलावाच्या बाजूला २ कृत्रिम तलाव तर उपवन, आंबेघोसाळे, निळकंठ वूडस्, टिकुजीनी वाडी, बाळकूम, रेवाळे आणि खारेगाव येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. सर्व ठिकाणच्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये आरतीस्थानं, निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, विद्युत आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी श्रीगणेश मूर्ती स्वीकृती केंद्रही उभारण्यात येणार आहेत. गणेश मूर्ती स्वीकृची केंद्रावर प्राप्त होणा-या गणेश मूर्तीचं महापालिकेमार्फत विधीवत विसर्जन केलं जाणार आहे. दीड, पाच आणि १० दिवसाच्या विसर्जनासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व ठिकाणी क्लोज सर्किट कॅमे-याद्वारे नजर ठेवली जाणार आहे.