राज्यामधील चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी होत असून संविधानानं दिलेल्या मताधिकाराद्वारे कार्यक्षम उमेदवाराची निवड करून लोकशाही बळकट करावी असा संदेश बाईक रायडर्सच्या माध्यमातून आज देण्यात आला. या जनजागृतीपर बाईक रॅलीला निवडणूक निरिक्षक शैली क्रिशनानी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सारे काम छोड दो सबसे पहले व्होट दो, बाते अभी अधुरी है-व्होट देना जरूरी है अशा घोषणा देत मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असून ते आपण पार पाडलं पाहिजे असे जनजागृतीपर संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्यात आले. आपल्या दुचाकीवरून संपूर्ण राज्यभर मतदानासाठी जनजागृती करणारे पुण्याचे बापूराव गुंड हे देखील या रॅलीत सहभागी झाले होते. ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदानाचा अधिकार बजवावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली तलावपाळी, राम मारूती रस्ता, गोखले रस्ता, तीन हात नाका, ॲपलॅब सर्कल, पासपोर्ट कार्यालय, कोरस टॉवर, उपवन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, हॅप्पी व्हॅली, ब्रह्मांड, कोलशेत, बाळकूम फायर स्टेशन, कापुरबावडी, कोर्टनाका, तलावपाळी मार्गे राम गणेश गडकरी रंगायतन येथे विसर्जित झाली.