जिल्ह्यातील खड्ड्यांची नवरात्रापूर्वी दुरूस्ती करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची पावसामुळे झालेली दुर्दशा नवरात्रापूर्वी दूर करावी असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी या विषयावर आयोजित बैठकीत पालकमंत्र्यांनी हे आदेश दिले. शहरामध्ये येणारे रस्ते आणि बाहेर जाणारे रस्ते यावर होणारी वाहतूक कोंडीची कारणं यावर पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. सर्व संबंधित यंत्रणांनी वाहतूक कोंडीवर एकत्रितपणे उपाययोजना कराव्यात असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. जेएनपीटीमध्ये असलेल्या वाहनतळांचा तात्काळ वापर करावा, सिडकोकडे असलेली वाहनतळं तात्काळ हस्तांतरीत करावीत, पालघर जिल्ह्यात वाहनतळासाठी जागा हस्तांतरीत कराव्यात, जिल्ह्यातील गोदामांचे वेळापत्रक निश्चित करून वेगवेगळ्या दिवशी सुट्टी द्यावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. ज्या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे त्या ठिकाणी अनावश्यक बॅरिकेटस् हलवण्यात यावीत, सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवावीत, महापालिकेच्या ताब्यात असलेली ११ वाहनतळं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिका-यांनी दिल्या. खड्डे तात्काळ न भरल्यास पथकर बंद करण्याचा इशारा यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading