जिल्ह्यात 4 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या काळात परीक्षा केंद्रांवर आणि परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी दिली आहे. 4 ते 30 मार्च पर्यंत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आणि 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा होणार आहेत. शहरातील विविध माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात या परीक्षा होणार असून या परीक्षा केंद्रांच्या परिसरात ठाणे शहर पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश जारी केला आहे. त्यानुसार परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु असताना परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षाप्रक्रिया संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच बंदोबस्तावरील पोलीस यांच्याशिवाय 100 मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, सायबर कॅफे, टेलिफोन बुथ इत्यादी दुकाने, सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्र आवारात मोबाईल फोन, पेजर, लॅपटॉप, आयपॅड, मायक्रोफोन आदी तत्सम साधनांचा वापर करण्यास मनाई आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर “महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ऍक्ट युनिव्हसिटी बोर्ड ऍन्ड अन्डर स्पेसिफाईड “एक्झामिनेशन एक्ट 1982” मधील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा मनाई आदेश 4 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत ज्या दिवशी परीक्षा होणार आहेत, त्यादिवशी लागू राहणार असल्याचे जयजित सिंह यांनी कळविले आहे.