जिल्ह्यातील पोलिस दलाला चारचाकी आणि दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामाध्यमातून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवितानाच गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ग्रामीण पोलिसांना १८ चारचाकी आणि ३१ दुचाकी वाहने वाटप करण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा येथील पोलिस कवायत मैदानावर झाला. त्यावेळी पालकमंत्री शिंदे बोलत होते.आपला जीव धोक्यात घालून पोलिस सामान्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. सणा-समारंभात ते कुटुंबियांपासून दूर राहून सामान्य नागरिकांच्या रक्षणाला प्राधान्य देत असतात, अशा कर्तव्यदक्ष पोलिसांच्या अडचणी समजून घेतानाच त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून पोलिस दलाला आवश्यक असलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने घेण्यात आली. ठाणे जिल्हा या वाहनांच्या मदतीने निर्मनुष्य असलेल्या इमारती, ठिकाणे येथे गस्ती वाढवावी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.पोलिस दल सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध करून देतानाच पोलिसांना वाहने, सीसीटिव्ही कॅमेरे देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. क्राईम रेट कमी करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, सामान्य नागरिक जेव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला येतात तेव्हा त्यांच्याशी सौजन्यपूर्वक वागणूक ठेवावी. पोलिस ठाण्यात अभ्यागत कक्ष तयार करावा, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. राज्य शासनाकडून ठाणे ग्रामीण पोलिसांना यापूर्वी सात चारचाकी वाहने मिळाली असून आज त्यात १८ चारचाकी आणि ३१ दुचाकी वाहनांची भर पडली आहे. ही वाहने ग्रामीण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील ११ पोलिस ठाण्यांना मिळणार असून प्रत्येक पोलिस ठाण्याला चारचाकी दोन वाहने तर दोन ते तीन दुचाकी वाहने उपलब्ध होणार असल्याचे विक्रम देशमाने यांनी सांगितले.