घोडबंदर रस्त्यावर अपघाती मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा खासदार राजन विचारे यांचा इशारा

घोडबंदर रस्त्यावर अपघाती मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. घोडबंदर परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वाहनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता या परिसराततील नागरिकांना वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. तसेच मुंबईकडे ये – जा करीत असताना कोपरी पुलाचं काम, मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची झालेली बिकट अवस्था आणि खड्ड्यांमुळे वाढणारी अपघाती मृत्यूची संख्या याची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली. तसेच या परिसरातील वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा कडून रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्थितरित्या केली जात नसल्याची बाब विचारे यांच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच आय आर बी टोल चे व्यवस्थापकांसोबत राजन विचारे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात मुंबई दिशेस जाणा-या वाघबीळ उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारा समोर दिशादर्शक फलक नसल्याने वेगाने येणारी वाहने उड्डाणपूल आणि खालील रस्ता यांच्यात तफावत असल्याने याठिकाणी आदळून अपघाती मृत्यू होत आहेत. परंतु वारंवार वाहतूक शाखेकडून सांगूनही महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने विचारे यांनी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता शशिकांत सोनटक्के यांना पत्र देऊन माहिती दिली. हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर खड्डे पडले आहेत. यामुळं याठिकाणी अपघाती मृत्यूची संख्या वाढत आहे. त्यामुळे तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर हे काम मार्गी लावावे. तसे न केल्यास अपघाती मृत्यूमुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असे अधिका-यांना बजावले. अधिकाऱ्यांनीही तत्काळ वरिष्ठांशी बोलून ही कामे येत्या 15 दिवसात पूर्ण करू असे आश्वासन राजन विचारे यांना दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading