घोडबंदर परिसरातील पाण्याची उग्र समस्या सोडवण्यासाठी एक कृती आराखडा ठरवला जाणार असून त्यासाठी येत्या शुक्रवारी बैठक होणार आहे. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. घोडबंदर परिसरात पाण्याची मोठी समस्या असून याबाबत केळकर यांनी विधानसभेतही आवाज उठवला आहे. महापालिकेने या पाणी समस्यावर तोडगा काढण्याऐवजी टँकर माफीयांनाच पोसत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. घोडबंदर परिसरात मोठमोठी गृह संकुल उभारण्यासाठी परवानगी देताना त्याला आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मात्र साल ढकल केली. त्यामुळे लाखो रुपयांची कर्ज घेऊन घर खरेदी करणाऱ्या ठाणेकरांना पाण्यासाठी टँकरवर लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. यावर ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे टँकर माफीयांचं पावलं आहे. जोपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नाही तोपर्यंत पालिकेने नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये अशी भूमिका आमदार संजय केळकर यांनी मांडली आहे. घोडबंदर परिसरातील निळकंठ, ग्रीन हिल क्रेस्ट, कॉसमॉस, पूजा, गॅलेक्सी, आनंद सावली, धर्मवीर नगर आदी भागाचा दौरा करून केळकर यांनी पाण्याची समस्या जाणून घेतली. या प्रकरणी येत्या शुक्रवारी महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीत पाणीटंचाईवर कृती आराखडा तयार केला जाणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं.