ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं गेल्या दोन दिवसात १०५ तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद दिला आहे. गेले दोन दिवस मान्सूनपूर्व पावसामुळे शहरात पाणी साचणे, वृक्ष पडणे अशा प्रकारच्या १०५ तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलास मिळाल्या होत्या. या सर्वच तक्रारींना आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलानं तात्काळ प्रतिसाद दिला. पावसाळ्यामध्ये आपत्ती निवारणासाठी विशेष काळजी घेण्यात यावी तसंच अग्निशमन दलानं सतर्क राहण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका क्षेत्रात पूरस्थिती उद्भवू नये याकरिता नालेसफाई आणि इतर आवश्यक उपाययोजना केल्या असून पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास २५३७ १०१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.