ठाण्यातील आंबा महोत्सव यंदा षोडश वर्षात पोहचला आहे. गेली १६ वर्षे असे महाकष्टाचे काम करून शेतकऱ्याना मदतीचा हात देण्यासोबतच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचे काम आमदार संजय केळकर करीत आहेत अशी प्रशंसा करून ज्येष्ठ सिनेनाटय दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी अशा प्रकारचे महोत्सव मुंबईतही व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार प्रतिष्ठान आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन काल सोहोनी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा चाखता यावा. यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाचे १६ वे वर्ष आहे.हा केवळ महोत्सव नसुन एक प्रकारची चळवळ आहे.तेव्हा,खवय्यांनी अस्सल आंब्याची चव चाखण्यासाठी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी. असे आवाहन केळकर यांनी केले. या महोत्सवाचे उद्घाटन चिमुकल्या पंचकन्याच्या हस्ते आंबा पूजन करून करण्यात आले. अर्चना परब यांनी मालवणी भाषेत गा-हाणे घालुन आंबा महोत्सवाला आगळ्या शुभेच्छा दिल्या.