गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून १०० बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. यंदा कोकणसाठी विशेष ‘मनसे एक्सप्रेस’ देखील मोफत सोडण्याचा संकल्प अविनाश जाधव यांनी बोलुन दाखवला. गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे कोकणवासिय आपल्या गावच्या विविध सण-उत्सवांना मुकले होते. यंदा नियम शिथिल करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जाणार आहेत.मात्र, गणेशोत्सवाच्या चार महिने आधीच कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांसमोर गावी कसे जायचे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेशभक्तांच्या मदतीला धावली आहे. गणपतीला जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसे १०० मोफत बसेस सोडणार आहे. यासाठी महाड, खेड, दापोली, मंडणगड, चिपळुण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, साखरपा, राजापूर कणकवली,देवगड, मालवण, सावंतवाडी, सुधागड-पाली तसेच पश्चिम महाराष्ट्रात सांगली – सातारा येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध असुन गणेशभक्तांनी मनसे मध्यवर्ती कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन अविनाश जाधव यांनी केले आहे.दरम्यान, यंदा प्रवाश्यांची संख्या वाढली असल्याने ठाणे ते सावंतवाडी ‘मनसे एक्सप्रेस’ सोडण्याचा संकल्प अविनाश जाधव यांनी केला आहे. मनसेमार्फत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची नौपाड्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयात अर्ज १२,१३,१४ ऑगस्ट रोजी अर्ज स्विकारण्यात येतील. ठाणे जिल्ह्यातील नागरीकांसाठीच ही मोफत बस सेवा उपलब्ध आहे.