ठाण्याचा ऐतिहासिक ठेवा समजल्या जाणा-या गडकरी रंगायतन या नाट्यगृहाची वास्तू आता धोकादायक झाली असून ती नव्यानं उभारण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सदस्य राजेश जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. शहराच्या मध्यभागात असलेली ही वास्तू उभारून आता २५ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या वास्तूची अनेकवेळा डागडुजी करण्यात आली. या वास्तूचं स्ट्रक्चरल ऑडीटही करण्यात आलं. या दोन्ही ऑडीटच्या अहवालात ही वास्तू धोकादायक झाली असून ती पाडून पुन्हा उभारण्यात यावी असं म्हटल्याचं सांगितलं जातं. एखाद्या इमारतीचा असा अहवाल आला तर ती तात्काळ पाडली जाते मग हाच न्याय या वास्तूबाबत लावला जावा अशी राजेश जाधव यांची मागणी आहे. या नाट्यगृहात एखादी दुर्घटना झाली तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे का, याचं उत्तर देण्याची मागणीही जाधव यांनी केली आहे. ही वास्तू पाडण्याऐवजी दुरूस्तीच्या नावाखाली त्यावर कोट्यावधीची उधळपट्टी करणं योग्य आहे का, यामुळं सर्वाचा विचार करून वास्तूची डागडुजी न करता वास्तूची नव्यानं उभारणी करावी अशी मागणी राजेश जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.