ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरु झाली असून त्यासाठी लागणारी रासायनिक खते, बी-बियाणे आणि किटकनाशके या निविष्ठा शेती आणि शेतकरी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. जिल्ह्यात भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 55 हजार हेक्टर एवढे आहे. तसेच एकूण खरीपाखालील क्षेत्र सर्वसाधारणपणे 65 हजार हेक्टर एवढे आहे. जिल्ह्यासाठी भात बियाण्यांची गरज 22 हजार क्विंटल एवढी असून 55% बियाणे बदल अपेक्षित धरुन शासनाकडे 12 हजार क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सुधारित आणि संकरित वाणांचा समावेश आहे. भात बियाण्यांचा पुरवठा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आणि विविध खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांमार्फत होतो. त्याचप्रमाणे 11,390 मेट्रीक टन रासायनिक खतांची शासनाकडे मागणी करण्यात आली असून जिल्ह्यासाठी 10,520 मेट्रीक टन खतांचा साठा मंजूर झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 2 हजार मेट्रीक टन खते उपलब्ध आहेत. खतांची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 20 ते 25 हजार लिटर विविध किटकनाशके आणि बुरशी नाशकांची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाचा कृषि विभाग, जिल्हा परिषदेचा कृषि विभाग, विविध यंत्रणा समन्वयाने काम करणार आहेत. रासायनिक खते, बी-बियाणे आणि किटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी यांना आळा घालण्यासाठी तसंच कृषि केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी 6 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.