मृत्यू दाखला आणि पार्थिव कोविड १९ चा अहवाल प्राप्त झाल्यावरच देण्यात यावे अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ठाण्यात कोविडची साथ मोठ्या वेगानं पसरत असून प्रशासन आपलं काम करत आहे. रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्याची कोविडची चाचणी केली जाते. परंतू पेशंट रिपोर्ट येण्याच्या आत मृत पावला तर त्याच्या मृत्यु दाखल्यावर कोव्हिड19 सस्पेक्ट असे मृत्यूचे कारण लिहिले जाते. साहजिकच त्याचे पार्थिव कुटुंबाच्या ताब्यात न देता ४-५ जवळच्या नातेवाईकांना त्याचे अंत्यदर्शन लांबून दिले जाते आणि पार्थिवाचा धार्मिक पद्धतीने अंत्यविधी केला जातो. नंतर त्यांचा रिपोर्ट येतो. मृत जर पॉझिटिव्ह असेल तर ही प्रक्रिया योग्य आहे पण मृत जर निगेटिव्ह असेल तर मृत व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय यांचे भावनिक आणि धार्मिक अंत्यविधी व्यवहार करण्याचे अधिकार प्रशासन का काढून घेते याचा विचार करावा असं मतदाता जागरण अभियानानं म्हटलं आहे. कोविड चाचणी केल्यानंतर अहवाल येण्याआधीच रूग्ण जर मृत पावला तर त्याचा अहवाल येईपर्यंत त्याचं पार्थिव कुटुंबाच्या ताब्यात न देता रूग्णालयाने ते मॉर्गमध्ये ठेवावं आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पालिकेच्या नियमावलीप्रमाणे त्याचा अंत्यविधी करावा आणि कोविड-१९ ने मृत असा दाखला द्यावा पण अहवाल जर निगेटिव्ह आला तर पार्थिव कुटुंबाच्या ताब्यात द्यावे आणि दाखल्यावर मृत्यूचे जे खरे कारण असेल ते लिहावे अशी मागणी मतदाता जागरण अभियानानं केली आहे. कौसा येथील 7 ते 8 रुग्णांच्या मृत्यू नंतर कोव्हिड 19 सस्पेक्ट हे मृत्यूचे कारण दाखल्यावर लिहिले आहे पण त्यांचे अहवाल नंतर निगेटिव्ह आले आहेत. म्हणून मृत कुटुंबाच्या भावनांशी आरोग्य अधिकाऱ्यांनी खेळू नये, नातेवाईकांना अंत्यदर्शन सुद्धा केवळ प्रशासकीय चुकीने घेता येऊ नये हे न्यायपूर्ण नाही असं अभियानाचं म्हणणं आहे. तरी याप्रकरणी तातडीनं लक्ष घालून आदेश द्यावेत अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं आयुक्तांकडे केली आहे.