कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर जनतेला दिलासा मिळावा यासाठी पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या दंड, व्याज, शास्ती (वाणिज्य वगळून) आदी बाबींमध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये 100 टक्के सवलत देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले असून त्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता देऊन त्याची अमंलबजावणी केली आहे. या अभय योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी आपला कर भरणा करावा असे आवाहन महापौरांनी केले आहे. 2014-15 मध्ये उत्पन्नाच्या विविध बाबींमध्ये गतिमानता येण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली होती. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, याच धर्तीवर कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक, व्यवसाय आर्थिक विवंचनेत आहेत, त्यांना दिलासा मिळावा यासाठी ही अभय योजना पुन्हा राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये पाणीपटटी (वाणिज्य वगळून) आणि मालमत्ता कराचे 1 जानेवारी 31 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये नागरिकांना पाणीपट्टी आणि मालमत्ता करामध्ये दंड/ व्याज, (शास्ती) आदीमध्ये 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे नागरिक, करदाते पाणीपट्टी आणि थकीत मालमत्ता कराच्या रकमेसह चालू आर्थिक वर्षाचा कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी भरतील त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. ज्या करदात्यांनी यापूर्वी दंड/ व्याजासह कराची रक्कम जमा केली असल्यास, ही योजना लागू होणार नाही. यापर्वी ठाणेकरांनी महापालिकेला वेळेवेळी सहकार्य केले आहे याचा विचार करुन नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी निर्णय घेतला आहे असे महापौर यांनी नमूद केले आहे.