कोरोनाबरोबरच विकासकामांच्या चर्चेसाठी महासभा घेण्याची नारायण पवारांची मागणी

कोरोनाबरोबरच ठाणे शहरातील विकासकामांच्या चर्चेसाठी तातडीने महासभा घ्यावी अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी महापौरांकडे केली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे दरमहा होणाऱ्या महासभा, स्थायी समिती आणि विशेष समितीच्या सभा झालेल्या नाहीत. महापालिकेतील जनसामान्यांचा आवाज उमटणारी महासभा मार्च महिन्यापासून झालेली नाही. त्यामुळे नगरसेवकांना सामान्यांचे प्रश्न मांडताना अडचणी येत आहेत. बहुसंख्य नगरसेवकांकडून प्रशासनाला ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जातो. मात्र पाठवलेल्या ई-मेलची दखलही घेतली जात नाही असं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. कोरोनाप्रमाणेच नालेसफाईसह शहरातील विकासकामांवर चर्चा होण्याची गरज आहे. आगामी काळात नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मालमत्ता कर-पाणीपट्टी वसूलीतून सवलत देण्याबरोबरच उत्पन्नात लक्षणीय घट झाल्यामुळे उत्पन्नवाढीचे नवे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या अर्थसंकल्पातील योजनांचाही पुनर्विचार करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुणे, नागपूर, भिवंडी महापालिकांच्या सर्वसाधारण सभा झाल्या. राज्यातील काही जिल्हा परिषदांकडूनही व्हर्च्यूअल सभा घेण्यात आल्या. तरी ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टिने महासभा घेण्याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading