कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा रुग्णालयात दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी समतोल सेवा फाउंडेशनतर्फे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. काही दिवसांपूर्वी केळकर यांना रुग्णालयातील सेवकांनी फोन करून जिल्हा कोविड प्रशासनाने पूर्वीप्रमाणे नाष्टा-जेवणाची व्यवस्था केली नसल्याचे तसेच अन्य सुविधांच्या कमतरतेबद्दल केळकर यांना सांगितले. याची तत्परतेने दखल घेत आमदार केळकर आणि विजय जाधव यांच्या पुढाकाराने तत्काळ अन्नछत्र सुरू करण्यात आले. येथील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, वार्डबॉय, आरोग्यसेवक, मदतनिस आदी सर्व फ्रंट वर्करना दर्जेदार अन्न आणि एनर्जी पेय दररोज दिले जात आहे. सध्या २०० आरोग्य सेवकांना ही सुविधा दिली जात असून कोरोना संकट येण्यापूर्वी जवळपास सात वर्षे संस्थेतर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नछत्राचा लाभ दिला जात होता. ग्रामीण भागातून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात येतात त्यांना या अन्नछत्राचा लाभ मिळत होता असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.