कृषी कायदा हा चांगला असून त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर कराव्यात. पंतप्रधानांनी एक फोन करून शेतक-यांशी चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली. एका न्यायालयीन प्रकरणात वाशी न्यायालयात हजर राहण्यासाठी आलेल्या राज ठाकरे यांनी नंतर ठाण्यालाही भेट देऊन पदाधिका-यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. कृषी धोरणाबाबत केंद्राचं आणि राज्याचं धोरण वेगळं असल्यास केंद्रानं राज्याशी चर्चा करायला हवी असंही मत राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. औरंगाबादच्या नामकरणाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशा दोघांवरही टीका केली. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तेव्हा नामकरण का नाही केलं, आता निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचा विषय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वीज बीलाचा प्रश्न हा सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंच उपस्थित केला. त्यावेळी भारतीय जनता पक्ष कुठे होता असा सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. अयोध्या दौ-याविषयी बोलताना त्यांनी हा विषय पक्षांतर्गत विषय होता असं सांगून अयोध्येच्या दौ-याविषयी इच्छा व्यक्त केली होती मात्र अजून काहीच ठरलं नसल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.