काँग्रेस शासनापेक्षा भारतीय जनता पक्ष शासनानं महाराष्ट्राला अधिक मदत दिली असा दावा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी केला आहे. अनुराग ठाकुर यांनी काल कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्या दरम्यान भारतीय जनता पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. ठाकुर यांचा हा मतदार संघाचा दुसरा दौरा होता. कल्याण लोकसभा मतदार संघ हा श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे. या मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या भेटी होत असल्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे. ठाकुर यांनी कळवा, मुब्रा, डोंबीवली या भागात भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि जनतेचा आम्हाला कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आशीर्वाद मिळेल, असा विश्वास मंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला. या वेळी खेलो इंडिया स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या खेळाडूंचा ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राच्या संघातून ठाण्याच्या संयुक्ता काळेने चार सुवर्णपदके आणि एक रौप्य, किमया कार्लेने तीन कांस्यपदके पटकावली. या दोघींबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू दिव्यांक्षी म्हात्रे, आर्या कदम, अवनी कदम, फिनिक्स जिम्नॅस्टिक अकादमीच्या कोच मानसी सुर्वे यांचा सत्कार केला. त्याचबरोबर जलतरण, मलखांब, अॅथलेटिक्सच्या विविध स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. सध्याचं डबल ईजिंन कोसळावं म्हणुन विरोधक वाट पाहत असले तरी हे सरकार राज्याचा विकास ताकदिने करेल असा विश्वास अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला.