कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या जवळपास २४ तास उलटल्यानंतरही सावळाराम क्रीडा संकुलात न पोहचल्यामुळं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना करणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात होणार आहे. मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्र सावळाराम क्रीडा संकुलात स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. पण मतदान उलटून २४ तासानंतरही कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाची मतदान यंत्रं सावळाराम क्रीडा संकुलात पोहचली नाहीत. या विधानसभा मतदारसंघाची साडेतीनशे यंत्रं कळवा-मुंब्र्यातून डोंबिवलीत पोहचायला वेळ का लागला असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे याची चौकशी करण्याची मागणीही शिवसेना करणार असल्याचं शिवसेनेचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितलं.