कल्याण डोंबिवली महानगरपालिका तलावाची विशेष काळजी घेणार आहे. कल्याणच्या गौरी पाडा तलावात केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक सादर केले. तलाव स्वच्छ करण्यासाठी फ्रान्समधील जेलीफिश बोट नामक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणाऱ्या रोबोटीक मशीनचे प्रात्यक्षिक केले. सध्या ए आय म्हणजेच आर्टिफिशयल इंटेलिजन्स वर आधारित तंत्रज्ञानाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या रोबोट आणि रोबोटिक मशीनची निर्मिती केली जात आहे. अशाच एका तलाव स्वच्छ करणाऱ्या रोबोटिक मशीनचे आज कल्याणात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हे मशीन भारतात पहिल्यांदाच दाखल झाले असून मुंबई महापालिकेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कल्याण पश्चिमेच्या गौरी पाडा तलावात हे मशीन सोडून त्याद्वारे तलावात पडलेल्या कचऱ्याची स्वच्छता कशी केली जाऊ शकते, याचा डेमो कंपनीतर्फे दाखविण्यात आला. वजनाला अतिशय हलके असणारे हे मशीन जॉय स्टिक किंवा जीपीएस कनेक्टेड रिमोटमार्फत चालवले जाऊ शकते या मशीनमध्ये उच्च क्षमतेचा कॅमेरा बसवण्यात आला असून त्याद्वारे तलावात दूरवर पसरलेला कचराही सहजपणे गोळा केला जाऊ शकतो तर एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हे तंत्रज्ञान असल्याने ऑटो प्रोग्रॅम केल्यानंतर कोणत्याही व्यक्ती विना हे मशीन तलावातील कचरा गोळा करत असल्याचे यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.फ्रान्समधील आयडीज या कंपनीने जेलीफिश बोट नामक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणाऱ्या या रोबोटिक मशीनची निर्मिती केली आहे. आयुक्तांनी स्वतः जॉयस्टीक द्वारे हे मशीन चालून पाहिले आणि या मशीनची प्रशंसा केली. परंतु या मशीनची किंमत पाहता महापालिकेसाठी ही अतिशय खर्चिक बाब ठरू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले.