कल्याणमधील बारावे भागात इमारतीसाठीच्या खोदकामामुळे दोन इमारतीना तडे जाण्याचा प्रकार घडला आहे. कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हील या उच्चभ्रू सोसायटीच्या परिसरात एका इमारतीचे खोदकाम सुरु असताना आजूबाजूच्या दोन इमारतींची संरक्षण भींत खचण्याबरोबरच या इमारतीच्या वीज आणि पाणी वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या असून इमारतीला देखील हादरे बसल्याची तक्रार करत नागरिकांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी संबधित ठेकेदाराला या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गोदरेज हिल परिसरात मिड टाऊन एव्हेन्यू इमारतीच्या पायाचे काम सुरु होते. यावेळी पोकलेनच्या मदतीने माती काढताना निरीज रिव्हेरा सोसायटी मधील शंतनू इमारतीची संरक्षक भींत खचली काही वेळात ही भींत ढासळू लागली. या भिंतीखालून इमारतीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या पाईप लाईन आणि विजेच्या वाहिन्या देखील तुटल्याने इमारतीचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत नागरिकांनी संबधित पोकलेन चालकासह ठेकेदाराला काम थांबविण्याची वारंवार विनंती केल्यानंतरही ठेकेदाराची मनमानी सुरु असल्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत इमारतीच्या भूमिगत पाण्याच्या टाकीला तडे गेले होते. यामुळे मागील २४ तास इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र ठेकेदाराने या इमारतीचे झालेले नुकसान भरून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तरीही नागरिक भीतीखाली वावरत असून पाया खचल्याने इमारतीला धक्का लागू नये यासाठी हे काम तातडीने थांबविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी इमारतीच्या आवारात गोंधळ घातला. अखेर प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी पोलिसांच्या मदतीने ठेकेदाराला काम थांबविण्यास भाग पाडत भिंत ढासळलेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट तातडीने करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्याचे सांगितले.