ऐरोली ते काटई नाका मार्गाचं काम रखडल्याचं दिसत असून सप्टेंबर २०१९ मध्ये हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं असताना प्रत्यक्षात मात्र ३० टक्के काम झाल्याचं दिसत आहे. खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांसह या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी ही बाब उघड झाली. ऐरोली ते काटई नाका या मार्गामुळे प्रवास अवघा १० मिनिटात होणार आहे. या कामाला २०१६ मध्ये मान्यता मिळाली तर मे २०१८ मध्ये या कामाचं भूमीपूजन झालं. ऐरोली ते काटई नाका हा प्रकल्प १२.३ किलोमीटरचा असून पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पर्यंतचा २.७१ किलोमीटर लांबीचे २ बोगदे असणार असून यामध्ये ३-३ मार्गिकांचे रस्ते असणार आहेत. या प्रकल्पासाठी २३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर दुस-या टप्प्यात ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर मार्ग हा अडीच किलोमीटरचा रस्ता उन्नत असणार आहे. यासाठी २७५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. या दोन्ही टप्प्यांचं काम सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन रस्ते विकास महामंडळानं दिलं होतं. पण प्रत्यक्ष पाहणीत हे काम अवघे ३० टक्के झाल्याचं दिसून आलं.