समता विचार प्रसार संस्थेतर्फे गेली २८ वर्ष घरातील प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत केवळ जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यश मिळवणा-या आधुनिक एकलव्यांना, एकलव्य गौरव पुरस्कार देण्यात येतो. गेल्या दोन वर्षांपासून संस्थेच्या एकलव्य सक्षमीकरण योजनेअंतर्गत महापालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना नववीत असतांनाच मुलांना तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन दिले जाते. यंदा कळवा आणि मानपाडा महापालिका शाळेत आणि रात्रशाळा क्र. ४९ हे वर्ग आयोजित करण्यात आले होते. यंदा या एकलव्य विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश संपादन केलं असून कळवा रात्र शाळेचा ८६.६%, कळवा महापालिका शाळेचा ९१% आणि मानपाडा महापालिका शाळेचा ७२% निकाल लागला आहे. श्रृती केदारे या मानपाड्याच्या शाळेतील विद्यार्थिनीला ८४ टक्के गुण मिळाले आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीत आत्याकडे ती राहत असून तिला आई वडील नाहीत. श्रृती बावस्करने ८३ टक्के मार्क मिळवले असून तिची आई घरकाम आणि वडील वॉचमनचे काम करतात. जीवन राठोड या विद्यार्थ्याला ७९ टक्के मिळाले असून त्याचे वडील पेंटर, आई घरकाम करते. कळवा रात्र शाळेच्या सायली दळवी हिला ६६ टक्के मिळाले असून ती काल्हेर येथील गारमेंट कंपनीत काम करून संध्याकाळी शाळेत शिकत होती. दीपक थोरात याने दिवसभर केमिकल कंपनीत काम करून, संध्याकाळी शाळा करत ४२ टक्के मार्क मिळवले. आई वडील नसल्याने मामा कडे राहून तो शिकत आहे. निशा गुंजाळ ही विद्यार्थिनी वडील नसल्यामुळे दिवसभर घरकामे करून संध्याकाळी शाळेत शिकत होती तिला ३७ टक्के मिळाले आहेत. पूजा सोनवणे या कळवा महापालिका शाळेतील विद्यार्थिनीला ६४ टक्के गुण मिळाले असून हिला आई वडील नाहीत, आजी आजोबांकडे राहून घरातील सर्व कामं करून तीने हे यश मिळवलं आहे. अंजली पासवान या विद्यार्थिनीने ४६ टक्के मिळवले आहेत. तिची आई घरकाम करते आणि वडील पेस्ट कंट्रोलचे काम करतात. बिकट परिस्थितीतही शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या एकलव्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा.