उपवन येथील रस्त्यावरून तरुणांकडून वेगाने दुचाकी, चारचाकी वाहने चालवत असल्याने तेथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे तसेच रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे तरुण पिढीला एक शिस्त लावण्याच्या दृष्टीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ते सुरक्षा फेरीचे आयोजन केले होते. रस्ते सुरक्षा फेरीमध्ये सहभागी होऊन तरुण पिढीला वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात संदेश देण्यासाठी परिषा सरनाईक यांनी नागरिकांना आवाहन केले होते त्याप्रमाणे स्थानिक रहिवाशी रस्त्यावर उतरून रस्ते सुरक्षा फेरीमध्ये सहभागी झाले होते. तसेच कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी मास्कचे बंधन आणि सोशल डिस्टनसिंगचे भान राखून रस्ते सुरक्षा फेरी पार पाडण्यात आली. या अभियानामुळे भविष्यामध्ये नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी आशा नगरसेविका परिषा सरनाईक यांनी व्यक्त केली.