घोडबंदर रस्त्यावर असलेला घोडबंदर-वरसावे टोलनाका अखेर उद्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून पूर्णपणे बंद होणार आहे. हा टोलनाका बंद केल्याबद्दल स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार सरनाईक यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. हा टोलनाका बंद करण्यात आल्याने ठाणे , मीरा भाईंदरच्या लाखो वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे या टोलनाक्यावर सर्व लहान वाहनांना याआधीच टोल मधून सूट मिळाली होती. फक्त मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनांकडून टोल घेतला जात होता. पण त्यामुळे येथे वाहतूक कोंडी व्हायची. बराच वेळ नागरिकांना कोंडीत अडकून पडावे लागे. त्याचबरोबर टोल वसुलीचे काम करणाऱ्या ‘आयआरबी’ कंपनीकडून या रस्त्याची नीट देखभालही केली जात नव्हती. त्यामुळे या टोलनाक्याची मुदतवाढ रद्द करून हा टोलनाका कायमचा येथून काढून टाकावा , अशी मागणी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. यामुळे वाहतूक कोंडी होते, नागरिकांना, वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो , वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते आणि हा टोलनाका फक्त ‘आयआरबी’ कंपनीच्या फायद्यासाठी चालवला जात असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला होता. या टोलनाक्याला दिलेली मुदतवाढ रद्द करण्यात आली आहे त्यामुळे हा टोलनाका हद्दपार होणार आहे. घोडबंदर टोलनाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून बंद होणार आहे.