कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे इराणमधील अबादान बंदरातील बोटी मधून बाहेर पडण्यास मज्जाव केल्यानं ठाण्यातील एका तरूणासह राज्यातील तिघेजण बोटीवर अडकले असून या तरूणांची सुटका करण्यात यावी अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. आखातातील अमीर बोटीवर ठाण्यातील विष्णू माळकर, भांडूपमधील सौरभ पिसाळ आणि कोल्हापूरमधील ॲन्थनी पॉल या तिघांसह ३३ कर्मचारी कार्यरत होते. इराणमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर अबादान बंदरातील बोटीवरील कर्मचा-यांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळं ८ दिवसांपासून आमीर बोट गोदीतच तळ ठोकून आहे. नौकेवरील ३० कर्मचा-यांची संबंधित देशांकडून सुटका करण्यात आली. मात्र भारतातील तिघे कर्मचारी अडकले आहेत. या तरूणांच्या सुटकेसाठी इराणमधील भारतीय राजदूतांनी प्रयत्न करावेत अशी मागणी डावखरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी किसननगर मधील तरूणाच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला.