अनेक गाजलेल्या गीतांचे लेखक मुरलीधर गोडे यांचं काल वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. मी कशाला आरशात पाहू गं, प्रीतीचं झुळझुळ पाणी, कानानं बहिरा मुका परी नाही अशा अनेक तुफान गाजलेल्या गाण्यांनी त्यांनी गीतकार म्हणून आपलं नाव गाजवलं. महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेचं अध्यक्षपदही त्यांनी भुषवलं होतं. साक्षरता प्रसारक म्हणून काम करताना त्यांनी हजारो प्रौढांना अक्षर ओळख करून दिली. प्रौढ शिक्षणावरही त्यांना डॉक्टरेट मिळाली होती. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या काही पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. आकाशवाणी, दूरदर्शनवरही त्यांनी लेखन केलं होतं. बन्याबापू चित्रपटातील ले लो भाई चिवडा लेलो, गरम मसालेदार चिवडा लेलो या गाण्यानं त्यांना प्रसिध्दी मिळवून दिली. काल त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.