ठाण्यातील विविध राजकीय नेत्यांचं इप्सित जवळपास साध्य झाल्यामुळे ठाण्यातील राजकीय नेते आता उत्सवापासून दूर होत असल्याचं दिसत आहे. दहीहंडी, गणपती, नवरात्री, होळी, धुळवड ठाण्यामध्ये राजकीय नेते मोठ्या उत्साहानं साजरी करत असत. कोणाचे सण-उत्सव शानदार आणि मोठे तसंच जल्लोषात साजरे होणार याबाबत अहमहमिका लागत असे. मात्र गेल्या काही वर्षापासून हे उत्सव राजकारण्यांच्या सहभागाअभावी झाकोळले गेले आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर टेंभीनाक्यावरील दहीहंडीचं महत्व कमी झालं. दिघे यांच्याच शिलेदारांनी वेगवेगळ्या दहीहंड्या सुरू केल्या. दिघे यांच्यानंतर आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडीला मोठं महत्व मिळवून दिलं. सरनाईकांच्या दहीहंडीत ९ थरांचा विक्रम झाल्यानंतर त्यांचाही दहीहंडीतील उत्साह मावळला. जितेंद्र आव्हाडही आमदार झाल्यानंतर काही वर्षांनी दहीहंडीपासून दूर झाले. शिवसेनेच्याच नेत्यांनी विविध उत्सवांमध्ये थोडीफार धुगधुगी ठेवली होती. आता त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या उत्सवांना नवीन जान देण्याचा प्रयत्न करत आहे. दहीहंडी आणि त्यानंतर आजची धुळवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरी केली. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना वगळता इतर पक्षांनी मात्र आता उत्सवाकडे पाठ फिरवल्याचंच दिसत आहे.