वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ. १ ली ते ८ वी पर्यतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी दि. ०८ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी प्रवेश पत्र तसेच हमी पत्राची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका / महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.
आरटीई अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात दि. ०५ एप्रिल २०२३ रोजी लॉटरीची प्रक्रिया राज्यस्तरावरून पूर्ण करण्यात आली असून या लॉटरी निवड यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण १०९९६ अर्जांची निवड झाली आहे. यामधील अद्यापपर्यंत केवळ २1४५ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी दिनांक ०८ मे २०२३ पर्यंतच मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी प्रवेश पत्र तसेच हमी पत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका / महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून विहित कालावधीत दि. ०८ मे २०२३ पर्यंतच आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर लघुसंदेश (एसएमएस) प्राप्त होतील. परंतु फक्त लघुसंदेशावर अवलंबून न राहता आरटीईच्या वेबसाईटरील अर्जाची स्थिती या सदरामध्ये अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील. प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका/मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत. त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री. कारेकर यांनी केले आहे.