काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलमधील उपासना नंदी ही देशात पहिली आली आहे. आयएससीचा राज्याचा निकाल ९९.७६ टक्के, तर देशाचा निकाल ९९.३८ टक्के लागला आहे. या परीक्षेत उपासनासह देशभरातील १८ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्वाना ९९.७५ टक्के गुण मिळाले आहेत. देशातील १५४ विद्यार्थी पहिल्या तीन स्थानांवर म्हणजे ९९.२५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. राज्यातील १४ विद्यार्थ्यांनी देशात पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले आहे. या परीक्षेला राज्यातील ३ हजार ७८१ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. देशातील ९६ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलच्या उपासना नंदी हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर याच शाळेच्या भाग्यश्री सिसोदिया हिने द्वितीय आणि ध्रुवी पंडय़ा हिने तृतीय क्रमांक पटकावला.