विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचं पालन करणं प्रत्येक राजकीय पक्षासाठी आणि उमेदवारासाठी बंधनकारक आहे असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघांसाठी २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात काय करावे आणि करू नये याची माहिती राज्याच्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. १९५० क्रमांकाची हेल्पलाईन, सी व्हीजील, मोबाईल ॲप, भरारी पथकं, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणेवर देखरेख ठेवली जाणार आहे. पोलीस यंत्रणा, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असून निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात होतील असा विश्वास जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही जिल्हाधिका-यांनी दिला आहे.