राज्य सरकार विषयी संभ्रम निर्माण केला जात असून आघाडी सरकारपेक्षा युतीच्या काळात उत्पन्नामध्ये वाढ होण्याबरोबरच राज्यावरील कर्जातही घट झाल्याचा दावा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ठाण्यात बोलताना केला. भारतीय जनता पक्षातर्फे राज्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शेलार यांनी हा दावा केला. युती सरकारनं सत्ता हाती घेतली तेव्हा असलेलं राज्याचं उत्पन्न आणि आताचं राज्याचं उत्पन्न यात भरीव वाढ झाली असून राज्याच्या कर्जातही घट झाली आहे. राज्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत राज्यावर साडेसोळा टक्के कर्ज होतं. तर आता सकल उत्पन्नाच्या तुलनेत या कर्जामध्ये घट झाली असून आता राज्यावर साधारणत: उत्पन्नाच्या तुलनेत १५ टक्के कर्ज असल्याचा दावा आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना केला. मात्र याबाबत भ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.गेल्या ५ वर्षात युती शासनानं केलेल्या कामाचा पाढा त्यांनी यावेळी वाचला. राज्यामध्ये २२० पेक्षा अधिक जागा मिळतील असं त्यांनी एका पश्नाला उत्तर देताना सांगितलं. राज्यात शेतक-यांना कर्ज माफी मिळवून दिली. कर्जाचे पैसे कमी कालावधीमध्ये थेट शेतक-यांच्या खात्यात जमा केल्याचा दावाही आशिष शेलार यांनी केला. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी शमवण्यातही यश आल्याचा दावा आशिष शेलार यांनी यावेळी केला.