अवघ्या ७२ तासात जितेंद्र आव्हाडांविरोधात २ गुन्हे दाखल झाल्याने लोकशाहीची हत्या आपण सहन करू शकत नाही म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. काल मुंब्रा येथे एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी झालेल्या गर्दीला बाजूला करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हाताने बाजूला केलं. त्यावरून पोलीसांनी त्या महिलेच्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याच्या तीव्र प्रतिक्रिया मुंब्र्यामध्ये उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्र्यामध्ये पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केली तर रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. या महिलेनं पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे तर दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कांगावा करायची सवय असून त्यांनी खुशाल राजीनामा द्यावा आम्ही ती जागा लढून जिंकून येऊ असं मुंबई भारतीय जनता पक्षाच्या आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.