कोर्टनाका परिसरात नव्यानं बसवला जाणारा अशोकस्तंभ भिवंडीतील अणजूर येथील कारखान्यात घडत आहे. ठाण्याच्या कोर्टनाक्यावर असलेला अशोकस्तंभ हा सर्वांना सुपरिचित होता. स्वातंत्र्यानंतर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य लढा आणि शहीदांची आठवण म्हणून या स्तंभाची उभारणी १९५२ मध्ये केली होती. ठाणेकरांच्या भावनांशी निगडीत असलेल्या या अशोकस्तंभाला १९८३ दरम्यान एका वाहनाने धडक दिली होती. त्यामध्ये हा स्तंभ उध्वस्त झाला. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी हा अशोकस्तंभ पुन्हा उभारावा यासाठी प्रयत्न केले. मंत्रालयात उभ्या असलेल्या अशोकस्तंभाची प्रतिकृती उभारणा-या मूर्तीकार निळकंठ खानविलकर यांचे पुत्र श्रेयस खानविलकर हे या अशोकस्तंभाची निर्मिती करत आहेत. अणजूरमधील कारखान्यात अशोकस्तंभ तयार करण्याचं काम सुरू असून आमदार केळकर यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली. निवडणुकीनंतर हा अशोकस्तंभ स्थानापन्न होणार असून या अशोकस्तंभाजवळच भारतीय राज्य घटनेची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे तर कृत्रिम बेटावर तिरंगा हाती घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची प्रतिकृती उभारली जाणार आहे. हा अशोकस्तंभ ३२ फूट उंच असून कोर्टनाका चौक नुतनीकरणासाठी पालिकेनं ६० लाखांची तरतूद केली आहे.