अखिल भारतीय बालविज्ञान परिषदेसाठी राज्यस्तरावर जिल्ह्यातून १८ प्रकल्पांची निवड – यामध्ये १० प्रकल्प सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचे

अखिल भारतीय बालविज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातून १८ प्रकल्प राज्यस्तरासाठी निवडले गेले असून यातील १० प्रकल्प हे एकट्या सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे आहेत. राष्ट्रीय बालविज्ञान परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली २८ वर्ष राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचं आयोजन केलं जात असून राज्यामध्ये गेली २० वर्ष जिज्ञासा ही बालविज्ञान परिषदेची समन्वयक आहे. यावर्षी जिल्हा बालविज्ञान परिषद ही ३ पातळीवर ऑनलाईन पध्दतीनं आयोजित करण्यात आली होती. शाश्वत जीवनासाठी सामाजिक नाविन्यपूर्णता हा विषय बालविज्ञान परिषदेसाठी देण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी या परिषदेचं आयोजन केलं जातं. यावर्षी १० ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांनी २६८ प्रकल्पांची ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी १०२ प्रकल्पांना सारांशाच्या आधारे जिल्हा पातळीवर निवडण्यात आलं. या निवड झालेल्या प्रकल्पातील बालवैज्ञानिकांनी व्हीडीओ द्वारे आपले प्रकल्प सादर केले. त्यातील २४ प्रकल्प प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निवडण्यात आले होते. १२ जानेवारीला परिक्षकांसमोर या प्रकल्पांचं ऑनलाईन सादरीकरण झालं. त्यामध्ये १८ प्रकल्पांची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद २९ जानेवारीला ऑनलाईन होणार आहे. निवडण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचे १० प्रकल्प आहेत तर सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय -२, डोंबिवलीचे स्वामी विवेकानंद विद्यालय, डॉ. बेडेकर विद्यामंदिर, सरस्वती सेकंडरी स्कूल, लिवे स्कूल, श्रीरंग विद्यालय आणि ए के जोशी इंग्लिश मिडीयम यांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाची राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading