अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी आज 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. शिवमंदिराचा विकास आराखडा मंजूर करून घेण्यापासून ते निधी मिळवण्यापर्यंत घेतलेल्या सर्व परिश्रमाला यश आल्याबद्दल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
शिवमंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाकडे अखंड आणि अविरत पाठपुरावा त्यांनी सुरू ठेवला होता. शिवमंदिराचा विकास 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये खर्च होणार असून दुसऱ्या टप्प्यात 23 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवेशद्वार, कमान उभारण्यात येणार आहे. तसेच बस स्टॉप विकसित करण्यात येणार असून जंतर-मंतर पार्क आणि दर्शनी भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याच ठिकाणी भव्य अशा पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी सुरुवातीला नऊ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. वालधुनी नदीचे संवर्धन तसेच अंबरनाथ शहराच्या बाजूने मंदिराकडे जाणारे- येणारे दोन नवीन टेनसाईल सस्पेंडेड ब्रिज उभारण्यात येणार आहेत. यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. पुर्वीपासूनच अस्तित्वातील प्राचीन कुंडाचे नुतनीकरण तसेच सध्याच्या पडीक उपहारगृहाचे पॅव्हेलियनमध्ये नूतनीकरण, अँफी थिएटर, संलग्न विद्युत व्यवस्था, वसाहतीच्या बाजूला रिटेनिंग वॉल बांधण्यात येणार असून त्याच ठिकाणी फुल मार्केट उभारण्यात येणार आहे.
खेळाचे मैदान, टेनसाईल रूफ, शिवमंदिर महोत्सवासाठी पायाभूत विकासकामे यासाठी साडे आठ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
वालधुनी नदीचा किनारा विकसित करण्यात येणार असून किनारा संवर्धन सोबतच प्राचीन शिवमंदिराच्या पौरानिक अवशेषांचे प्रदर्शन क्षेत्र निर्माण करण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या विकास आराखडयानुसार अंतिम टप्प्यात वालधुनी नदीच्या किनारी सर्व भाविकांसाठी विरंगुळा घाट बांधण्यात येणार आहे. यानुसार टप्पा 1 मध्ये 20 कोटी व टप्पा 2 मध्ये 23 कोटी असे मिळून एकूण 43 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.