शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारख्या आपल्या नेत्यांना आवरावे. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो हे लक्षात ठेवावे असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्रांना दिला आहे. विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टीका-टिपणी करत असतात. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आपल्या नेत्यांना आवरावे अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल देखील लागू शकतो. हे ध्यानात ठेवावे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगले वातावरण रहावे, असे जर मुख्यमंत्रांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर, शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावे, त्यांना योग्य ती समज द्यावी असे परांजपे यांनी म्हटले आहे. २०१९ ला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती मतदारसंघात विजय झाला. सातत्याने बारामती मतदारसंघात विकास कामांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेला आहे. याहीवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ येथुन निश्चित विजयी होईल. विजय शिवतारे त्यांचा वैयक्तिक अजेंडा चालवित असतील तर त्यांना योग्य ती समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे.आम्ही देखील असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी वातावरण गढूळ करु शकतात. असा स्पष्ट इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.