पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी सर्व महापालिका अधिकारी कर्मचा-यांनी सतर्क रहावं. सततच्या पडणा-या पावसामुळं शहरातील सखल भागात साचणा-या पाण्याचा तात्काळ निचरा व्हावा यासाठी त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना कराव्यात तसंच ज्या ठिकाणी अत्यावश्यक कामं सुरू आहेत तो परिसर संरक्षित करून कामं करावीत. पावसामुळे शहरात कोणतीही जिवित आणि वित्तहानी होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीनं करावी अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी दिल्या आहेत. पावसामुळं डोंगराळ भागातून वाहून आलेला कचरा नाल्यातून तातडीनं काढण्यात यावा. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्यास ते तातडीनं बुजवण्यात यावे. ज्या भागात पाणी साचते तिथे आवश्यक ती कार्यवाही करावी. रस्त्यांवरील चरांचे पुनर्पृष्ठीकरण करावे अशा सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या. ज्या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे त्या ठिकाणी बॅरिकेटींगमुळे पाणी अडणार नाही याची काळजी घ्यावी. रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलाव्यात अशा काही सूचना अतिरिक्त आयुक्तांनी केल्या आहेत.