काही लोकांच्या स्वार्थामुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांना विरोध केला जात असल्याचा दावा भिवंडीचे महापौर जावेद दळवी यांनी केला आहे. काल भिवंडीतील नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता आणि सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यावर भिवंडी काँग्रेसने टावरेंना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या ठरावाच्या वेळी हे नगरसेवक कुठे होते असा प्रश्न जावेद दळवी यांनी उपस्थित केला आहे. सुरेश म्हात्रे हे जिल्हा परिषदेत सभापती असून काँग्रेसचे साधे सदस्यही नाहीत, मग या काँग्रेस नगरसेवकांना म्हात्रेंचा पुळका का आला असा प्रश्नही दळवींनी उपस्थित केला आहे. ठाण्यातील पत्रकार परिषदेला ३५ नव्हे तर अवघे १५ नगरसेवक उपस्थित होते असा दावाही दळवी यांनी केला.