लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आचार्य अत्रे अशा पदव्या सरकारनं नव्हे तर जनतेनं दिल्या होत्या. आताही यापुढे सरकारची वाट न पाहता भारतरत्न सावरकर असंच म्हणायचं असं आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी काल केलं. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षातर्फे शरद पोंक्षे यांच्या अथांग सावरकर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर उगाचच टीका केली जाते. त्यांचा भारतरत्न पुरस्कारानं गौरव होण्यासाठी जनतेनं सरकारची वाट पाहू नये. आपण भारतरत्न सावरकर म्हणण्यास आजपासूनच सुरूवात करूया असं आवाहन शरद पोंक्षे यांनी यावेळी केलं. ने मजसी ने परत मातृभूमीला या अजरामर गीतासाठी तरी सावरकरांना भारतरत्न द्यायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. इंदिरा गांधींनी सावरकरांवरील पहिलं टपाल तिकिट काढलं होतं. तर दादर येथे शिल्प उभारण्यासाठी स्वत:च्या खात्यातून १५ हजार रूपये दिले होते. त्यामुळं ज्यांना आपल्या आजीचा इतिहास माहित नाही त्यांनी टीका करू नये असा टोला शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता लगावला. सावरकरांच्या जन्मभूमीतच त्यांच्या सन्मानाचा प्रस्ताव आणता येत नाही हे दुर्दैव आहे अशी खंत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. यावेळी यमुनाताई सावरकर यांच्या चरित्र लेखनाबद्दल साधना जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.