पाणी गळती रोखण्यासाठी शिवसेनेनं एका विशेष पथकाची निर्मिती केली असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला जात आहे. सध्या पाऊस लांबल्यामुळं भीषण पाणी टंचाईची भीती व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर असली तरी शहरात मात्र पाण्याची नासाडी सुरू आहे. ही नासाडी टाळण्यासाठी शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पाण्याची गळती टाळण्यासाठी जलवाहिन्या, नळांची मोफत दुरूस्ती या उपक्रमांतर्गत केली जात आहे. इमारतीच्या बाहेर पाण्याची गळती होते अथवा घरातील नळ गळतोय, मग फक्त एक कॉल केल्यास शिवसेनेचे दुरूस्ती पथक दाखल होऊन विनामूल्य दुरूस्ती करून देत आहे. या माध्यमातून ठिबकणारे नळ आणि फुटक्या जलवाहिन्यांमधून वाया जाणा-या लाखो लिटर पाण्याची बचत होत आहे. सध्या हा उपक्रम काजूवाडी, रामचंद्रनगर, जिजामातानगर, साईनाथनगर, अंबिकानगर क्रमांक १, लुईसवाडी आणि हजुरी भागात राबवला जात आहे. आपल्याकडेही एखादी जलवाहिनी फुटलीय अथवा नळ गळत असेल तर ९९६९७ ३९७७९ या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.