रिक्षा चालकांनी प्रवाशांशी चांगली वागणूक ठेवावी आणि भाडं नाकारू नये असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केलं आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील रिक्षा चालकांची एक बैठक आपल्या कार्यालयात बोलवली होती. या बैठकीत अमित काळे यांनी रिक्षा चालकांना योग्य वर्तणुकीसाठी अनेक सूचना केल्या. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा योग्य ठिकाणी उभ्या कराव्यात, रिक्षा चालकांनी चुकीच्या मार्गाने रिक्षा चालवू नयेत, चौथा प्रवासी घेऊ नये अशा अनेक सूचना या बैठकीत अमित काळे यांनी रिक्षा चालकांना केल्या. यावेळी रिक्षा चालकांच्याही समस्या आणि अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या. रिक्षा चालकांनी ठिकठिकाणी रिक्षांसाठी खास थांबे निर्माण करावेत, वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी अशा समस्या, अडचणींबाबत वाहतूक शाखेच्या उपायुक्तांना अवगत केलं. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या समस्या सोडवण्याचं आश्वासन यावेळी दिलं. या बैठकीला दीडशेहून अधिक रिक्षा चालक, विविध रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.