संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ओनिल कुलकर्णी यांनी ठाण्यात बोलताना केलं. जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकार दिनाचं औचित्य साधून महिला सुरक्षा या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. महिला या असुरक्षित नसून त्या सुरक्षित आहेत ही भावना आणि मानसिकता समाजात निर्माण होण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका गरजेची आहे. महिला सुरक्षा आणि सबलीकरणासाठी समाजातील सर्वच घटकांबरोबर पालक, कुटुंब, माध्यमं, शिक्षण संस्था यांचाही सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. महिला सुशिक्षित झाल्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. परंतु त्यांना सुरक्षितता मिळाली नाही. कायदे आपल्या बाजूला आहे असं महिलांना वाटलं पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी सर्वजण घेतात. काळजीबरोबरच मानसिकता बदलून तिला भावनिक संरक्षण देण्याची गरज ओनिल कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.