महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाणेकरांना टोलमुक्त करण्यासाठी पुन्हा आनंदनगर टोलनाका येथे धरणं आंदोलन केलं. यापूर्वी ठाणेकरांना टोलमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मानवी साखळी करत आंदोलन केलं होतं. शिवसेनेचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं मात्र ते अद्याप पूर्ण केलं नसल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी केला. टोलचा झोल बंद करा, ठाणेकरांसाठी टोल बंद करा अशा विविध घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. ठाणेकरांना टोलचा मोठा फटका बसतो. अगदी काही किलोमीटर जाण्यासाठी ठाणेकरांना भूर्दंड पडत आहे. त्यामुळं एमएच०४ क्रमांक असणा-या गाड्यांना टोलमधून मुक्ती मिळावी अशी मागणी होत होती. मध्यंतरी आमदार संजय केळकर यांनी एमएच०४ या क्रमांकाच्या गाड्यांना टोलमधून मुक्ती मिळाल्याचं जाहीर केलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र अद्यापही टोल भरावाच लागत आहे. त्यामुळं किमान एमएच०४ क्रमांकाच्या गाड्यांना टोलमधून मुक्ती मिळावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे.