डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असणा-या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावं अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. लंडनमध्ये ज्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलं ते घर आपण विकत घेतलं आहे. मात्र या देशातील गोरगरिबांना त्या स्मारकाला भेट देणं शक्य आहे का, त्यामुळं ज्या बीडीडी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली त्या बीडीडी चाळीची इमारत ताब्यात घेऊन तिथे जागतिक स्तरावरील राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण वरळीमध्ये गेलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील २२ वर्ष वरळीमधील बीडीडी चाळीत काढली. आजही तीच खोली ज्या खोलीत त्यांनी अभ्यास केला, लहानाचे मोठे झाले, खेळले ती इमारत जशीच्या तशी उभी आहे. याच खोलीत शाहू महाराज त्यांना भेटायला आले होते आणि बाबासाहेबांची हुशारी पाहून त्यांना शिकण्यासाठी लंडनला पाठवले होते. अशा इमारतीत आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.