मेट्रो कारशेडसाठी जमिनी घेताना शेतक-यांचं समाधान करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

मेट्रो कारशेडसाठी ओवळा मोघरपाडा येथील शेतक-यांची जमीन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला हवी आहे पण शेतक-यांना योग्य तो मोबदला मिळावा आणि मगच कारशेडचं काम सुरू करावं अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. ठाण्यातील ओवळा-मोघरपाडा येथे कारशेड उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी जमिनीचं सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या प्राधिकरणाच्या अधिका-यांसमोर प्रताप सरनाईक यांनी ही भूमिका मांडली. मोघरपाडा येथे वर्षानुवर्षे शेतकरी भातशेती करत आहेत. मोघरपाडा येथील शेतजमिनीवर मेट्रो कारशेडचं आरक्षण असून या कारशेडसाठी १०० एकर जागा प्राधिकरणाला हवी आहे. या जागेचं सर्वेक्षण करण्यासाठी अधिकारी आज आले होते. त्यावेळी तिथे २०० ते २५० शेतकरी जमले होते. प्राधिकरणाचे अधिकारी सर्वेक्षणासाठी आले मात्र कोणतीही नोटिस दिली नसल्याचं शेतक-यांचं म्हणणं आहे. जर ही जमीन कारशेडला दिली तर शेतक-यांनी उपजिविका कशी करायची असा प्रश्नही शेतक-यांनी उपस्थित केला. ओवळा-मोघरपाडा येथे वर्षानुवर्षे शेतकरी शेती करत असून अशा सर्व शेतक-यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. त्याआधी त्यांच्या नावावर सरकारी जमिनी करून द्याव्यात, स्थानिक भूमिपुत्र शेतक-यांचा विश्वास संपादन करा, त्यांच्यासह बैठक घ्या, त्यांचं समाधान करा आणि मगच कारशेडचं काम सुरू करा अशी स्पष्ट भूमिका सरनाईक यांनी यावेळी मांडली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading