राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा विकासाला – शिवसेनेच्या राजकारणाला बळी पडणार नाही – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कायम असून आमचा पाठिंबा विकासाला आहे. त्यामुळं शिवसेनेच्या राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही अशी स्पष्टोक्ती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. आयुक्त विरूध्द लोकप्रतिनिधी असा वाद ठाण्यात रंगला असून आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठरावही मंजूर करण्यात आला आहे. परंतु आता राष्ट्रवादीनं आपली भूमिका बदलली असून या प्रकरणाला सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. वरिष्ठांकडून आलेले चुकीचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात शिवसेनेला अडचणी आल्यानंच त्यांनी आयुक्तांवर निशाणा साधला आहे. शिवसेना आयुक्तांचा उपयोग करून घेत असून चुकीच्या कामांमध्ये त्यांचा उपयोग नसल्यानं त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. स्थायी समिती निवडणूक, स्थायी समिती सदस्य निवडणूक, स्वीकृत सदस्याच्या निवडणुकीतही त्यांनी आयुक्तांना बोलण्यास भाग पाडले होते. शिवसेनेची भूमिका ठाम नसून गरज पडली तर ते आयुक्तांचे पायही धरतात आणि गरज सरली की ते आयुक्तांच्या विरोधातही बोलतात. ज्युपिटरच्या प्रस्तावाबाबत कोण कोणाला कुठे भेटले, ताजमध्ये कोणत्या प्रस्तावावर चर्चा झाली याची सर्व माहिती आपल्याकडे असून वेळ आली की ती दिली जाईल असा इशाराही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading