देशात वर्षाला २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन मोदी सरकारनं दिलं होतं. मात्र नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून कंपन्या बंद पडत असल्यानं अनेकांच्या हातून रोजगार निसटू लागले आहेत. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ढोल बजाओ सरकार जगाओ असं आंदोलन करण्यात आलं. भाजप सरकारच्या कार्यकाळात जवळपास १ लाख ४२ हजार कंपन्या बंद झाल्यानं लाखो सुशिक्षित तरूण बेरोजगार झाले आहेत. तरीही हे सरकार कुंभकर्णाच्या झोपेतून जागं होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर ढोलताशांचा गजर करण्यात आला. सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी बूट पॉलिश, छत्री दुरूस्ती, चणेवाला अशा नानाविध भूमिका साकारत सरकारप्रती आपला रोष प्रकट केला. जर रोजगार निर्मिती तात्काळ केली नाही तर वर्षा बंगल्यावर जाऊनही ढोल वाजवायला मागे हटणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला.